निर्वाणा वेळच्या कविता

 पूर्वी फक्त शब्दच खोटे असायचे 

आणि लोक डोळ्यावर विश्वास ठेव म्हणायचे 


आता दृश्येही खोटी झाली 

आणि अनुभवही 


सगळंच पडद्यातून चालत यायला लागलं 

आणि जे चालतं ते खरं की खोटं 

डोळ्यांना कळणं मुश्किल झालं 


ऑडिशन्स यायच्या 

आणि त्यावर विश्वास ठेवता यायचा 


आता ए.आयच्या साह्याने कोण काय बदलेल सांगता येत नाही 

म्हणजेच पुन्हा एकदा प्रत्यक्षाचे आगमन 


जे समोर आहे तिथेही मेकअपचा प्रॉब्लेम आहेच 

शिवाय आपल्या नावाने कोण अकाउंट उघडेल 

हे सांगणं कठीण 


आपल्या किती फेक आयडेंटिटीज कोणा कोणाशी कसला कसला शेक हँड करतायेत कोणास ठाऊक?


आपले चेहरे कुठे कुठे डकवले जात आहेत 

कोणास ठाऊक?


ठोकमपट्टी हीच घोकम पट्टी झालीये

ज्यात चाय कम पाणी जास्त 


दुधाच्या जागी सुद्धा मिल्क पावडर सेटल 


जोवर क्लोन्स आपल्या ताब्यात आहेत तोपर्यंत भीती नाही 

पण क्लोन्स ताब्यात आहेत कुठं ?


आपल्या या आयडेंटिटीज आपल्याला माहीत सुद्धा नाहीत तिथे ताबा फार दूरची गोष्ट 


आपण पसरलोय 

आणि आपला पसारा आपल्यालाच माहीत नसावा ?


महादेवा 

तुझा तिसरा डोळाच बरा बाबा 


सगळंच राख झालं 

तर काय आर्टिफिशियल आणि काय डिजिटल आणि काय रियल?


मी आयुष्यात प्रथमच 

डोक्यात राख घालून 

चाललोय 


श्रीधर तिळवे नाईक


(निर्वाण या सिरीज मधील निर्वाणावेळच्या कविता या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना